18 July, 2010

मराठी नाट्यसंगीत - राम गणेश गडकरी

माझा संपूर्ण मराठी ब्लॉग-पोस्ट लिहीण्याचा पहिलाच प्रयत्‍न, त्यामुळे काही चुका आढळल्या तर कृपया समजून घ्यावे.

महाराष्ट्रातील कोणीही शाळेच्या फक्त ४ इयत्ता जरी शिकलेला असेल तरी त्याला राम गणेश गडकरी कोण हे माहीत नसणे अशक्य आहे. मराठी नाट्यसंगीतमध्ये एकच प्याला नाटकाला काही विशेष महत्व आहे. एकच प्याला ह्या दोन शब्दांचा उल्लेख असंख्य चित्रपट, नाटक इ. मधे झालेला आहे. हे संगीत-नाटक लिहिल आहे राम गणेश गडकरी यांनी - असा माणूस ज्याला वयाच्या १९ वर्षापर्यंत मराठी नीट बोलता येत नसे.

गडकरींचा जन्म झाला २४ मे १८८५ रोजी नवसारी, गुजरातमध्ये. गरीबी आणि लहान असतानाच झालेला पितृशोक यामुळे नीट शिक्षण त्यांना घेता आले नाही. वयाच्या १९व्या वर्षी शालेय शिक्षण संपवल्यावर गडकरींनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. पण गणितात नापास झाल्यावर पहिल्याच वर्षी कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

गडकरींनी मग मराठी, संस्कृत आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमधील साहित्य वाचायला सुरूवात केली. त्यांनी संस्कृतमधील कालिदास आणि भवभूति, मराठीमधील ज्ञानेश्वर, मोरोपंत, केशवसुत आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि इंग्रजीमधील विलियम शेक्स्पियर, पर्सी शेली आणि मार्क ट्वेन यांच्या साहित्याच्या सखोल अभ्यास केला. गडकरींनी मग गोविंदाग्रज हे नाव घेऊन कविता आणि बालकराम हे नाव घेऊन विनोदी साहित्य लिहिण्यास सुरूवात केली. गडकरी लिहितात,

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा, मग पुढे

कोल्हटकरांच्या संपर्कात आल्यावर, त्यांच्याकडुनच प्रेरणा घेऊन गडकरींनी संगीत नाटके लिहिण्यास सुरूवात केली. भाषेवर प्रभुत्व, चातुर्य आणि प्रचंड कल्पनाशक्तीची देणगी असल्यामुळे त्यांनी एकाहून एक अशी उत्तम नाटके लिहिली. आपल्या फक्त ३५ वर्षाच्या आयुष्यात त्यांनी ४ संपूर्ण संगीत नाटके, ३ अपूर्ण संगीत नाटके, १५० कविता आणि काही विनोदी लेख इतकी साहित्यरचना केली.

१९१२ मध्ये सर्वप्रथम आल ते सामाजिक जीवनावर आधारलेल संगीत प्रेमसंन्यास. नंतर १९१७ मध्ये गडकरींनी लिहिल नाचत ना गगनांत हे उत्कृष्ठ पद असलेल संगीत पुण्य-प्रभाव.

कशी या त्यजू पदाला, प्रणतनाथ रक्षी कांत अशी उत्तमोत्तम पदे असलेल, सामाजिक जीवनातील दारूच्या दुष्परिणामांवर आधारलेला संगीत एकच प्याला गडकरींनी १९१९ साली लिहिल.

१९१९ साली हलक-फुलक विनोदी पण भावनिक अस संगीत भाव-बंधन नाटक त्यांनी लिहिला. हे नाटक पूर्ण लिहून झाल्यावर फक्त अर्ध्या तासाने वयाच्या केवळ ३४व्या वर्षी राम गणेश गडकरी वारले.

गडकरींची ३ संगीत नाटके अपूर्णच राहिली - गर्व निर्वाण, वेड्यांचा बाजार आणि राजसंन्यास. त्यापैकी वेड्यांचा बाजार नाटक चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

गडकरींची नाटके समजण्यास थोडी कठीण पण उत्कृष्ठरित्या मांडलेली आहेत. त्यांनी त्यांच्या नाटकांमधून सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवले. त्यांची सर्व नाटके प्रचंड लोकप्रिय होण्याच कारण म्हणजे - अतिशय मजबूत पात्र-निर्मिती, उत्कृष्ठ संगीत आणि उत्तम विनोद. त्यांच्या नाटकंबरोबर, नाटकातील काही पात्रे देखील अमर आहेत. एकच प्यालामधील सिंधु, सुधाकर, भाव-बंधनातील घनश्याम, प्रेमसंन्यासमधला गोकुळ प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवलेल आहे.

विजय तेंडुलकर म्हणतात, गडकरी हे कालिदासानंतर भारतीय भाषेमधले सर्वोत्तम कवी-नाटककार आहेत. ठाणे महानगर पालिकेने १९७९ साली बांधलेल्या नाट्यगृहाला गडकरी रंगायतन असे नाव देऊन राम गणेश गडकरी यांचा गौरव केला. गडकरींच स्थान हे मराठी साहित्यामध्ये खूपच मानाच आहे आणि विशेषत: त्यांनी लिहिलेल्या संगीत नाटकांनी तर मराठी नाट्यसंगीताची शोभा, किर्ती अजुनच महान झाली आहे.

गडकरींच्या संगीत प्रेमसंन्यास, संगीत एकच प्याला, संगीत पुण्य-प्रभाव आणि संगीत भाव-बंधन ह्या नाटकांमधील पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साइट पहावी.

संगीत प्रेमसंन्यास

संगीत एकच प्याला

संगीत पुण्य-प्रभाव

संगीत भाव-बंधन