11 March, 2011

संगीत मानापमान - मार्च २०११ - १००वे वर्ष

प्रथमत: नवीन पोस्ट लिहिण्यासाठी इतका मोठा खंड पडल्याबद्दल क्षमस्व. यापुढे नियमीत लिहीण्याचा प्रयत्न करीन.

संगीत मानापमान नाटकाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हे नाटक प्रथम काकासाहेब खाडिलकरांनी मार्च १९११ मध्ये रंगभूमीवर आणले होते. ह्या अजरामर नाटकबद्दल लिहिताना मला खूप आनंद होत आहे. मला माझ्या बायकोने जेव्हा ह्या नाटकाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत ह्याची आठवण करून दिली त्या क्षणी मी ब्लॉग पोस्ट लिहायला घेतली. बालगंधर्व, दीनानाथराव यांनी संगीत मानापमानाला एका उत्तुंग अश्या ठिकाणी नेऊन ठेवले आहे. ह्या नाटकातील पदे अत्युत्कृष्ठ आहेत.

प्रमुख पात्रे = भामिनी, धैर्यधर, लक्ष्मीधर, बाबासाहेब इ.

भामिनी ही एका अती-श्रीमंत घराण्यातील मुलगी. धैर्यधर भामिनीच्या वडिलांच्या सैन्यातील सेनापती. भामिनीचे वडील बाबासाहेब यांची अशी इच्छा आहे की भामिनी आणि धैर्यधर यांचे लग्न व्हावे. पण भामिनीच्या बहिणीला मुळीच असे वाटत नाही. तिला हवे आहे की भामिनीचे लग्न एका मोठ्या श्रीमंत घरात व्हावे आणि त्यासाठी तिने लक्ष्मीधर नावाच्या एका धनवान पण अती-भित्र्या माणसाला पसंतसुद्धा केले आहे. पण भामिनी मात्र ह्या गोष्टीशी सहमत नाही. ती म्हणते कशी "खरा तो प्रेमा न धरी लोभ मनी".

धैर्यधर हा अतिशय पराक्रमी असा सेनापती आहे. तो नेहमीच शूरांची पूजा करतो - यासाठी तो म्हणतो "शूरा मी वंदिले". लक्ष्मीधर भामिनीबद्दल धैर्यधरच्या मनात राग उत्पन्न करतो. बाबासाहेबांच्या सांगण्यावरून भामिनी धैर्यधरच्या छावणी शेजारील बागेत वनमाला नाव धारण करून रहायला येते. तेथेच धैर्यधर तिला पाहतो आणि प्रेमात पडतो. शेवटी बाबासाहेब जेव्हा सांगतात वनमाला ही खरी वनमाला नसून भामिनी आहे तेव्हा धैर्यधरच्या मनातील भामिनीबद्दलचा राग निवळतो आणि ते लग्न करतात व लक्ष्मीधरची फजिती होते.

खर तर संगीत मानापमानाची कथा नुसती वाचून समाधान होत नाही. मराठी रंगभूमी निर्मितीच्या गंधर्व नाटक मंडळीनी चारुदत्त आफळे आणि अस्मिता चिंचाळकर समवेत संगीत मानापमान परत आणले आहे. ते नाटक यू-ट्यूब वर उपलब्ध आहे.


ह्या नाटकमधील पदांसाठी आठवणीतील गाणी ही उत्कृष्ठ वेब-साइट पहावी.

संगीत मानापमान